मुंबई – देशात आज राष्ट्रीय नौदल दिवस साजरा केला जात आहे. देशाचा मजबूत नौदलावर प्रत्येक भारतीयाचा गर्व आहे. परंतु या आधुनिक आणि शक्तिशाली नौदलाची स्थापना ज्या महान व्यक्तीने केली होती त्यांचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज! ‘ज्याचं आरमार त्याचा समुद्र; आरमार हे एक स्वतंत्र्य राज्यांच आहे,’ हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वराज्य आणि मराठा सामाज्राचा विस्तार होत असताना, शिवाजी महाराजांनी सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी शक्तिशाली आरमार उभारले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक (father of Indian Navy) असे म्हटले जाते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जवळील शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला होता. त्यांनी मोठ्या संघर्षाने आणि मुसद्दीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्याच्या स्थापनेनंतर सीमांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने त्यांनी कोकण किनारपट्टीवर मराठा आरमार उभारले. 1658 साली शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली होती. त्या काळी मराठा साम्राज्यामधे कल्याण आणि त्याच्या आसपासचा संपूर्ण भाग होता. कोकणापासून ते गोव्यापर्यंतच्या समुद्र किनाऱ्याचे रक्षण करण्यासाठी मराठा आरमार सक्षम होऊ लागले.
मराठा साम्राज्याच्या परकीय व्यापाराला पोर्तुगीज, डच, इंग्रजी जहाजांचा अडथळा होत असे. त्यांना कर दिल्याशिवाय कोणत्याही जहाजांना अरबी समुद्रात विहार करता येत नसे. मराठा आरमाराची स्थापना झाल्याने कोकण किनारपट्टीचे पोर्तुगीज, अरबी, डच समुद्री लुटारुंपासून संरक्षण होऊ लागले. मराठा आरमारासाठी सक्षम अशा लढाऊ जहाजांची निर्मिती पेन, कल्याण आणि भिवंडी येथे झाली होती. जहाजांच्या निर्मितीचे काम पोर्तुगीज खलाशी लुई व्हेगास आणि त्याचा मुलगा फेर्ना व्हेगास यांच्या देखरेखीखाली झाले होते. त्यासोबत असंख्य मराठी कामगार जहाजांच्या निर्मितीला हातभार लावत होते. या जहाजांची निर्मिती 1657 ते 1658 दरम्यान झाली होती.
आरमारासोबत समुद्री किल्ल्यांच्या डागडुजी आणि निर्मितीकडेही महाराजांनी लक्ष दिले. सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी या किल्ल्यांच्या निर्मितीवरून ते दिसून येते. शिवाजी महाराजांनी या आरमाराची अतिशय शिस्तबद्ध उभारणी केली होती. महाराजांच्या प्रशासनातील कृष्णाजी अनंत सभासद लिहतात की, आरमारात दोन स्क्वाड्रन होते. प्रत्येक स्क्वाड्रनमध्ये 200 जहाजे होती. सर्व जहाजे वेगवेगळ्या बांधनीची होती. संपूर्ण मराठा आरमारात साधारण 400 ते 500 जहाजे होती, असा अंदाज ऐतिहासिक दस्ताऐवजांवरून लावता येतो.
इंग्रज अधिकाऱ्यांच्या नोंदीनुसार 1665 मधे मराठा आरमारामधे 85 लढाऊ आणि 3 अतिशय उच्च दर्जाची जहाज होती, तसेच नोव्हेबर 1670 मधे नविन 160 जहाजांची बांधनी कुलाबा जिल्ह्यातील नादगांव येथे करण्यात आली. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या आरमाराचा उल्लेख ब्रिटिश, डच, पोर्तुगिजांनीही केला आहे. परंतु त्यांनी मराठा आरमारात नक्की किती जहाजे होती. त्याचा उल्लेख केलेला नाही.
कान्होजी आंग्रे हे मराठा आरमाराचे पाहिले सेना प्रमुख, आरमाराच्या प्रमुखाला दर्यासागर म्हणत. महाराजांच्या आरमारात अनेक मुसलमान सैनिकही सेवेत होते. इब्राहिम आणि दौलत खान त्यातील एक होते. सिद्दी इब्राहीम आर्टिलरीचे प्रमुख होते. ज्याला आजच्या आधुनिक नौदलाचा भाग समजले जाते.
शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीमुळे समुद्री सीमांचे सरंक्षण होऊन बळकटी आली. पुढे मराठा साम्राज्याचा मोठा विस्तार झाला. मराठा सैन्याचा एक भाग म्हणून मजबूत आरमाराकडेही पाहिले जाऊ लागले. महाराजांच्या या नौदल रणनीतीचा उल्लेख आजही गौरवाने केला जातो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हटले जाते.