Israel Story : चर्चेत असलेल्या इस्राइल – पॅलेस्टाईन ची कथा, काय आहे इतिहास.

Israel Story : चर्चेत असलेल्या इस्राइल – पॅलेस्टाईन ची कथा, काय आहे इतिहास.

दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन आणि मित्रपक्षांचा विजय झाला असला तरी ब्रिटनची अपरिमित हानी झाली होती. त्यांच्या वसाहतींचा कारभार हाकणं त्यांना अवघड झालं होतं, हळूहळू ते वसाहतींमधून माघार घ्यायला लागले. 1948 च्या मे महिन्यात पॅलेस्टाईन प्रदेशातून ब्रिटनने माघार घेतली, आणि आपआपला देश बनवण्यासाठी अनेक वर्षं संघर्ष करणाऱ्या अरब आणि ज्यू लोकांमध्ये अंतर्गत युद्ध पेटलं. प्रश्न होता, ही भूमी नक्की कोणाच्या हातात जाणार. युद्ध तुल्यबळांचं नव्हतं. अरबांच्या तुलनेत ज्यूंची संख्या अतिशय कमी होती पण या दिवसाच्या तयारी गेले कित्येक वर्षं तिथे असणाऱ्या आणि इस्रायलचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक ज्यू ने अनेक वर्षांपासून केली होती. 14 मे 1948 साली इस्रायलने आपलं स्वातंत्र्य घोषित केलं. 2000 वर्षांत पहिल्यांदा पूर्णपणे ज्यूंचा देश अस्तित्वात आला होता. मुस्लीमबहुल प्रदेशाच्या मधोमध ज्यूंचा देश निर्माण झाला.

अरबांची संख्या एका बाजूला होती तर ज्यूंचं लढण्याचं शास्त्रशुद्ध ट्रेनिंग, नेतृत्व, रणनिती दुसऱ्या बाजूला. त्यातच ज्यूंना मात देण्यासाठी शेजारच्या तब्बल पाच अरब देशांनी – इजिप्त, सीरिया, जॉर्डन, लेबेनॉन आणि आणि इराकचं सैन्य आलं. एक दिवसापूर्वी अस्तित्वात आलेला देश आता आपल्या अस्तित्वाची लढाई लढत होता. अरबांना इस्रायलचं अस्तित्व जगाच्या पटलावरून पुसून टाकायचं होतं. इस्रायलला आपल्या भूमीतल्या अरबांना हाकलून आपला साम्राज्यविस्तार करायचा होता. हा रक्तरंजित संघर्ष गेली 73 वर्षं चालूये.

एखादा देश कसा तयार होतो? एकतर तो प्रदेश आधीपासूनच तिथे अस्तित्वात असतो किंवा त्या भूप्रदेशाची फाळणी होऊन दोन देश तयार होतात.

पण जिथे कोणत्याच सीमा आखलेल्या नाहीत, तिथे बाहेरच्या जगातून लोक येत राहून कालांतराने एका धर्माच्या लोकांचा देश कसा तयार होऊ शकतो? इस्रायलसंबधांत हाच प्रश्न मलाही पडला होता.

इस्रायलच्या जन्माची कथा गुंतागुंतीची आहे आणि तुटक-तुटकही. तीच गुंतागुंत सोप्या शब्दात सलग उलगडून सांगण्याचा प्रयत्न या लेखात केलाय.

यातून इस्रायलच्या जन्माची कथा तर कळेलच पण इस्रायलचा इतिहास, इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षांचं मुळ, इस्रायल आणि अरब राष्ट्रांचं युद्ध याही प्रश्नांची उत्तर मिळतील.

जेरुसलेम

इस्रायलची कथा सुरू होते जेरुसमलेममधून. सन 1095. नोव्हेंबर महिन्यातल्या एका थंड सकाळी पोप अर्बन दुसरा याने फ्रान्सच्या क्लेअरमाऊंट शहरात दिलेल्या एका प्रवचनाने युरोपचा चेहरामोहरा बदलला.

काय होतं त्या प्रवचनात असं? त्या प्रवचनाने 200 वर्षं चालेल्या ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मियांच्या युद्धाचं रणशिंग फुंकलं. या युद्धांना नंतर ख्रिश्चनांनी क्रुसेड्स असं नाव दिलं तर मुस्लिमांनी जिहाद.

लॅटिन चर्चने 1095 ते 1271 या काळात होली लँड आणि होली सिटी मुस्लीम अधिपत्याखालून काढून त्या प्रदेशावर पुन्हा आपला ताबा मिळवण्यासाठी युद्ध केली. होली लँड म्हणजे आजचा इस्रायल, पॅलेस्टाईन, जॉर्डन, सिरिया आणि लेबेनॉनचा काही भाग आणि होली सिटी म्हणजे जेरुसलेम.

हा तोच काळ होता जेव्हा धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यातल्या संघर्षांने तसंच चर्चच्या विभागणीमुळे धर्मसत्तेचं आसन डळमळायला लागलं होतं.

यातून बाहेर पडायचा एक रस्ता पोप अर्बन दुसरा याला दिसला, तो म्हणजे एका परकीय, पापी, धर्मबाह्य शत्रूविरोधात युद्ध घोषित करायचं आणि ख्रिश्चनांना एकत्रित करायचं. एक लाख ख्रिश्चन स्त्री, पुरुष, लहान मुलं सैनिक बनून साडेचार हजार किलोमीटरचा रस्ता कापत जेरुसलेमच्या वाटेला निघाले. एकाच वेळेस नाही, लहान लहान गटात.

अर्थात तोवर जेरुसलेम मुस्लीम शासकांच्या हातात जाऊन 400 वर्षं लोटली होती आणि या भागात ज्यूंचं प्रमाण नगण्य असलं तरी त्यांचं अस्तित्व कायम होतंच.

क्रुसेडर्सचा पहिला जथ्था निघाल्यानंतर बरोबर चार वर्षांनी जेरुसलेम त्यांच्या ताब्यात आलं, त्यानंतर जवळपास 100 (1099 ते 1187) जेरुसलेम आणि आसपासच्या भागात त्यांनी राज्य केलं. सालदिनच्या मुस्लीम योद्धांनी त्यांचा पराभव केला आणि होली लँड पुन्हा एकदा मुस्लीम शासकांच्या हातात गेलं.

जेरुसलेम जगातल्या सगळ्यात जुन्या शहरांपैकी एक आहे. इतिहासाची पानं चाळली तर लक्षात येतं की जेरूसलेमवर अनेक शासकांनी राज्य केलं.

इसवीसन पूर्व 1700 शतकात इथे कॅननाईट लोकांनी राज्य केलं, मग इजिप्तच्या फेरोंनी त्यानंतर आले इस्रेलाईट्स म्हणजेच आजचे ज्यू ज्यांचे वंशज आहेत असं समजलं जातं ते लोक.

इसवीसन पूर्व 1000 च्या पूर्वार्धात जेरुसलेम, आताचा इस्रायल, पॅलेस्टाईन, जॉर्डन, लेबेनॉन आणि सिरिया या देशांचा प्रत्येकी काही भाग मिळून इस्रेलाईट लोकांची दोन साम्राज्य होती. प्राचीन इस्रायल आणि जुडाहचं राज्य. जेरूसलेम जुडाहच्या राज्याची राजधानी होतं.

प्राचीन इस्रायलच्या साम्राज्याचे उल्लेख हिब्रू बायबल तसंच काही धर्मग्रंथामध्ये सापडतात पण त्याचे ऐतिहासिक पुरावे कमी आहेत.

मग कालांतराने हा भाग बॅबिलोनियन, पर्शियन, ग्रीक (अलेक्झांडर द ग्रेट ने आक्रमण केलं तेव्हा), रोमन, बायझेंटाईन आणि सरतेशेवटी मुस्लीम शासकांच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतरही इथे सत्तापालट सतत होत राहिला. इथे राज्य करणारे शेवटचे शासक होते ऑटोमन.

या साम्राज्याचा अस्त ब्रिटिशांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात 1918 ला केला.

वरती वर्णन केलेल्या भागाला लँड ऑफ इस्रायल किंवा होली लँड असंही म्हणतात. याचे उल्लेख अनुक्रमे हिब्रू बायबल आणि बायबलमध्ये आहेत. ज्यू धर्मियांमध्ये अशी मान्यता आहे की इथेच ज्यू धर्माचा उदय झाला, इथेच त्या धर्माचे कायदे तयार झाले आणि हीच भूमी देवाने वारसहक्काने ज्यू धर्मीयांना दिलेली आहे. त्यांची ही धार्मिक मान्यता जेनेसिस आणि एक्सोडस या हिब्रू बायबलच्या भागांवर आधारित आहे.

‘ज्यू लोक एकदिवस आपल्या जमिनीवर (लँड ऑफ इस्रायलमध्ये) परत येतील’ अशी भविष्यवाणी धर्मग्रंथात केली आहे. या भविष्यवाणीवरच ज्यू राष्ट्राची राजकीय संकल्पनाही आधारित होती.

इतकी सगळी कथा सांगण्याचं कारण एकच की ज्यू लोकांना आपला देश बनवण्यासाठी हाच भूभाग का हवा होता ते लक्षात यावं.

गंमत म्हणजे या भागात राहाणाऱ्या अरब मुस्लिमांना जग आज पॅलेस्टिनी म्हणून ओळखत असलं तरी या भूभागाला सगळ्यांत आधी प्राचीन ग्रीक लेखकांनी पॅलेस्टाईन म्हटलं होतं आणि पुढे रोमन शासकांनी ते नाव वापरलं. ऑटोमन साम्राज्यापर्यंत हे नाव कायम राहिलं.

इस्रायलची स्थापना आणि अरब राष्ट्रांचा हल्ला

वाढत्या नाझी प्रपोगंडामुळे युरोपमधले ज्यू पळून जात होते, पण अनेक देशांची दार त्यांना बंद होती. वाढत्या ज्यू स्थलांतरितांमुळे पॅलेस्टाईन प्रदेशात असंतोष वाढत होता, त्यामुळे ब्रिटीशांनीही ठरवलं की ज्यूंचं येणं थांबवायचं. ज्यू आता अवैधरित्या या भागात प्रवेश करायला लागले.

1920 ते 1940 या काळात या प्रदेशातल्या ज्यू आणि अरब लोकांमध्ये सतत संघर्ष होतच होता. अनेकदा दंगलीही व्हायच्या.

दुसरं महायुद्ध भडकलं तेव्हा पॅलेस्टाईन त्यातून वेगळं राहू शकलं नाही. ब्रिटिशांबरोबर लढण्यासाठी ज्यू लोकांचं सैन्य स्थापन करून त्यांची मदत घ्यावी असा प्रस्ताव तत्कालीन पंतप्रधान चर्चिल मांडला पण ब्रिटीश सरकार आणि सैन्याने तो फेटाळला. त्यांचं म्हणणं होतं सैन्यात ज्यू आणि अरब लोकांची संख्या समसमान असावी. पण अरबांना ब्रिटिशांकडून लढण्यात रस नव्हता. त्यांचे नेते, जेरूसलेमचे मुफ्ती नाझी जर्मनीच्या बाजूने वळाले.

याच काळात ज्यू लोकांचं स्थानिक सैन्य तयार झालं होतं ज्याचं नाव होतं हागनाह (संरक्षण दल).

अरबांनी ब्रिटिशांच्या विरोधात उठाव करायला सुरुवात केली. जाफामध्ये हल्ले व्हायला लागले. ब्रिटिशांनी सैन्याला पाचारण केलं. या युद्धात 5000 हून जास्त अरबांचा मृत्यू झाला. जेरूसलेमचे मुफ्ती अल-हुसैनी फ्रेंच प्रशासित सीरियाला पळाले.

दुसरं महायुद्ध संपल्यानंतर 1947 मध्ये ब्रिटनने पॅलेस्टाईनचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांसमोर मांडला. संयुक्त राष्ट्रांनी तोडगा दिला की एक स्वतंत्र ज्यू राष्ट्र असावं, एक स्वतंत्र अरब राष्ट्र असावं आणि जेरूसलेमवर आंतरराष्ट्रीय नियंत्रण असावं. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केलं आणि ज्यूंना पॅलेस्टाईनमध्ये यायला मज्जाव करता येणार नाही असं सांगितलं.

ब्रिटन दुसऱ्या महायुद्धानंतर आधीच जर्जर झाला होता. 1948 साली पॅलेस्टाईनमधल्या ज्यू लोकांनी स्वातंत्र्याची घोषणा केली आणि इस्रायलची निर्मिती झाली. ज्यू लोकांना दोन हजार वर्षांनंतर स्वतःचा देश मिळाला होता. इस्रायलची स्थापना झाल्या झाल्या त्याला अमेरिका आणि रशिया या दोन्ही शक्तिशाली देशांनी मान्यता दिली.

ब्रिटिशांनी पॅलेस्टाईनमधून माघार घेतली आणि देशांतर्गत ज्यूंचं आणि अरबांचं सैन्य एकमेकांना भिडलं. पॅलेस्टिनी अरबांच्या मदतीना जॉर्डन, सीरिया, इराक लेबेनॉन, इजिप्तचंही सैन्य आलं. पाच देशांनी मिळून इस्रायलवर आक्रमण केलं होतं.

इस्रायलची स्थापना होऊन अजून एक दिवसही झाला नव्हता. देशाची लोकसंख्या होती आठ लाखाच्या आसपास. देशच अस्तित्वात नव्हता, त्यामुळे इतर देशांशी शस्त्रास्त्र करार करण्याचा प्रश्न नव्हता. अरब देशांचं सैन्य इस्रायलच्या सैन्याच्या कितीतरी पट जास्त होतं.

पण दुसऱ्या महायुद्धात मित्रराष्ट्रांच्या बाजूने लढलेले आणि काही महत्त्वाच्या लढायांमध्ये मोक्याची भूमिका बजावलेले सैन्याधिकारी ज्यू होते आणि आता ते इस्रायललाठी लढत होते.

जून महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या सांगण्यावरून इस्रायल आणि अरब राष्ट्रांनी युद्धविरामाची घोषणा केली. इस्रायलला आपली रसद पुन्हा भरून घेण्याची संधी मिळाली. रशियासारखी मोठी राष्ट्र त्यांना मागच्या दाराने मदत करत होती.

त्यामाने अरब सैन्यात सुसुत्रता कमी होती. पाच राष्ट्रांचं सैन्य मिळूनही इस्रायलचं अस्तित्व नकाशावरून पुसू शकलं नाही. पण इस्रायलचा काही भूभाग मात्र त्यांनी ताब्यात घेतला. जॉर्डनकडे वेस्ट बँक भाग गेला, इजिप्तने गाझा पट्टी मिळवली. पूर्व जेरूसलमेही त्यांच्या हातातून निसटलं.

इस्रायलकडे पश्चिम जेरूसलेम आणि पॅलेस्टाईनचा इतर भाग राहिला. हे पहिलं अरब-इस्रायल युद्ध होतं.

1949 मध्ये या इस्रायलने जॉर्डन, इजिप्त, लेबेनॉन आणि सीरियासोबत युद्धबंदीचे करार केले. ज्याच्या वाटेला जी जागा आली ती आली असा साधा अर्थ या करारांचा होता. पण या युद्धाची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. अपार मनुष्यहानी झाली होती.

<

Related posts

Leave a Comment